जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) केंद्रांवर किमान हमीभावाने कापूस खरेदीच्या मर्यादेत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सीसीआयने कापूस खरेदी करण्यासाठी प्रती हेक्टर १२ क्विंटल मर्यादा निश्चित केली होती. मात्र आता ही मर्यादा २३ क्लिंटल पर्यंत वाढविण्यात आली आहे. याविषयासाठी राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या विषयासाठी पाठपुरावा केला होता. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीतही हा विषय लावून धरला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आहे आहे.

राज्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित सिंचन प्रणालीचा वापर करत आहेत. त्यामुळे त्यांची कापूस उत्पादकता पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त झाली आहे. वास्तविक उत्पादन वाढले असताना, खरेदी केंद्रांवर जुन्या कमी उत्पादकतेनुसार खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांना आपला जादा कापूस विकताना मोठ्या अडचणी येत होत्या. याच पार्श्वभूमीवर, हमीभाव योजनेअंतर्गत कापूस खरेदीची हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी जोर धरत होती.

पणनमंत्री जयकुमार रावल यांनी शुक्रवारी (ता. १२) विधानसभेत या संदर्भात निवेदन दिले आणि ही घोषणा केली. या नवीन निर्णयानुसार, आता राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी कापूस खरेदीची उच्चतम मर्यादा हेक्टरी २३.६८ क्विंटल (म्हणजेच २३६८ किलो प्रति हेक्टरी) एवढी निश्चित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्देश दिले की, राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी उच्चतम उत्पादकतेनुसार हेक्टरी २३ क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याप्रमाणे कापूस खरेदी करावी. या निर्देशानुसार, आता प्रत्येक खरेदी केंद्रावर सुधारित आणि वाढीव उत्पादकतेप्रमाणे कापूस खरेदी केली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळेल.






