⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Jalgaon: नवरदेवाला घेऊन जाणारी कार पेटली, चालकाच्या प्रसंगावधानाने ५ जीव वाचले

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२३ । चालत्या वाहनांना आग लागत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येतेय. आता अशातच एक थरार घटना भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पाहायला मिळाली आहे. नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या कारने पेट घेतल्याची घडलीय. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत नवरदेवासह गाडीतून प्रवास करणारे पाचही जण बचावले आहेत. मात्र, आगीच्या घटनेत काही वेळातच कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नेमकी काय आहे घटना?
अमरावती येथील रोहन हरी डेंडूळे यांचे मंगळवारी मालेगाव येथे लग्न होते. या विवाह सोहळ्यासाठी स्वतः नवरदेव रोहन डेंडूळे यांच्यासह आकाश शिवदास डेंडूळे, वैशाली अमर बागरे व चालक राहुल वैराळे असे पाच जण एम.एच २७ बी .व्ही. ७९५६ या क्रमांकाच्या कारने अमरावती येथून मालेगाव येथे जात होते.

यादरम्यान भडगाव तालुक्यातील कजगाव गावाजवळ कारची वायर जळाल्याचे कार चालक राहुल वैराळे याच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली. कारमधील नवरदेव तसेच इतर चार जणांना बाहेर उतरविले, आणि तो स्वतः सुद्धा बाहेर पडला.सर्व जण बाहेर पडताच कारला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली.