⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोठी बातमी : भाजपने पाठविले राज्यपालांना पत्र, वाचा जसेच्या तसे पत्र..

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यातील राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले असून गेल्या पाच दिवसापासून सुरु असलेला तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत असून भाजप कुठेही समोर आलेली नव्हती. गुरुवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समोर येत पत्रकार परिषद घेतली तर आज शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी देखील माविआ बहुमत सिद्ध करेल असे सांगितले. महाराष्ट्रवासी नागरिक सध्या संभ्रमात असून मंत्रिमंडळात दोन दिवसात तब्बल १६० पेक्षा अधिक शासननिर्णय जारी करण्यात आले आहेत. राज्यातील घडामोडी लक्षात घेता भाजप देखील मैदानात उतरले असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठविले आहे. राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर असून हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी पाठविलेल्या पत्रातील मजकूर जसाच्या तसा..
महामहिम राज्यपाल,
महाराष्ट्र
विषय : राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असतेते जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत..
महोदय,
कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच. आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो. एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे. अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णय सपाटा राबविला जात आहे.

कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलांत झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.
महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हक्काच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या पत्रानंतर भाजप देखील मैदानात उतरली असून अद्याप शिंदे गटाला समर्थन असल्याचे कुठेही म्हटलेले नाही. भाजपनेच एकनाथ शिंदे यांना खुराक पुरवली असून सर्व राजकीय घडामोडी मागे भाजप असल्याचे म्हटले जात आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने ते रुग्णालयात उपचार घेत असून आज त्यांची सुट्टी होण्याची शक्यता आहे. दरेकर यांच्या पत्रानंतर राज्यपाल काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.