जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । जळगाव प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत खरीप पिकांची उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात अली असून ११८.९७ कोटी रक्कमेचे वाटप विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरु असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.
योजनेंतर्गत काढणी पश्चात नुकसान दोन आठवड्यांच्या आत म्हणजेच १४ दिवसात बिगर मोसमी आलेल्या पावसामुळे झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निकषांचे अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली. पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर नुकसान झाल्यानंतर असल्यास ७२ तासांच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनीस देण्यात आली होती. नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला आहे.
जिल्ह्याची सन २०२१-२२ या वर्षाची खरीप पिकांची एकूण नुकसान भरपाई १ लाख ४ हजार २७० शेतकऱ्यांना रुपये १८४,९३ कोटी रक्कम विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत राबवण्यात आलेली होती. शेतकरी हिस्सा म्हणून २७.४८ कोटी रुपये विमा कंपनीकडे भरण्यात आले होते. या पूर्वी खरीप पिकांसाठी मिड सिजनसाठी २७.७२ कोटी रुपये, स्थानिक आपत्तीसाठी ३७.९८ कोटी रुपये व काढणी पश्चात ०.२६ कोटी रुपये असे एकूण ६५.९ कोटी रुपये ९५ हजार ८२३ शेतकऱ्यांच्या बॅक खाती आयसीआयसी लोमबार्ड कंपनीकडून जमा केली आहे.