जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । सनसनाटी निर्माण करण्याच्या उद्देशाने या बातम्या पेरण्यात आल्या. विशेष सरकारी वकील आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी या बातम्या दिल्या. रिमांडमध्ये माझ्या नावाचा कुठेही उल्लेख नाही. पतसंस्था खरेदी प्रकरणातील माझा आणि कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. मी उद्योजक म्हणून आहे. माझ्या कंपन्यांनाचा अधिकृत उद्योग २०० कोटींचा आहे. बीएचआरकडून घेतलेले कर्ज कोणतीही सेटलमेंट न करता भरलेले आहे. त्या अनुषंगाने तपास यंत्रणेने तपास करावा. जर त्यात काही तथ्य असेल तर कारवाई करावी, असे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

आ.चव्हाण म्हणाले की, राजकारणात काही लोक मदत करतात तर काही जण इतर भुमिका पार पाडतात. ज्या-ज्या ठिकाणी सरकारच्या विरोधात बाजू मांडताना आवश्यक वाटते ते मी करतो. बीएचआरमध्ये तपास यंत्रणेने कोणतीही माहिती देताना नियमांचे पालन करावे. माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने माध्यमात बातम्या पेरण्यात आल्या. कुणी या बातम्या पसरवल्या हे मी समोर आणेल. कुणीतरी राजकीय कट कारस्थान रचून बहुजन समाजाच्या लोकप्रातिनिधिला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. आजारी अजून नॉट रीचेबल होणारा मी आमदार नाही. सांगतील तेव्हा मी हजर राहील. ज्यांनी माझी बदनामी केली असेल त्यांच्या विरोधात मी रीतसर कायदेशीर बाजूने तक्रार करणार आहे. ठेवीदारांना पैसे मिळविण्याचा प्रमुख उद्देश असताना ठराविक लोकांना अडकविण्याचा हा प्रयत्न आहे. अनेकांनी पावत्या मॅचिंग केल्या असताना ठराविक लोकांना अडकविण्याचे कटकारस्थान सरकारने आणि काही लोकांनी करू नये, असेही आ.चव्हाण म्हणाले. मी अनेक प्रकरणात पत्रव्यवहार केला आहे. आजवर ६ हजार पत्रे माझ्या कार्यालयातून गेली आहेत. माझ्या मतदारसंघातील काही नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने मी पत्रव्यवहार केला आहे. तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा माझा कोणताही संबंध नाही. जर तसे असेल तर मी केव्हाही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहे, असे आ.चव्हाण यांनी सांगितले.
मी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेला पत्र लिहिणार असून तपास यंत्रणेतील सर्व अधिकाऱ्यांना भेटणार आहे. सुनील झंवर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. मी मागितलेली माहिती अद्याप अपूर्ण असून ती वेळ आल्यावर विधिमंडळात मांडणार आहे. सध्या असे पसरवले जाते आहे की, कर्जदारांनी पैसे भरल्यावर ते ठेवीदारांना मिळतील परंतु ते चुकीचे आहे. कर्जदारांनी सुरक्षेपोटी ती रक्कम न्यायालयात जमा केली आहे. अंतिम निकाल लागल्यावरच पुढील रक्कम ठेवीदारांना मिळणार आहे. सध्या ठेवीदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आ.चव्हाण यांनी सांगितले.







