⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

तुम्हीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाताय? मग ‘या’ स्थळांनाही अवश्य भेट द्या..

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाची आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) जोरात होणार असून उत्साहानं विठुरायाचे भक्त पुन्हा पालखी सोहळ्यात सामील झाले आहे. आषाढी एकादशी निमित्त्य लाखो भाविक विविध पालख्यांसोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात (Pandharpur) येतात. पंढरपुरात विठू माउलींच्या मंदिराशिवाय अनेक ठिकाणं आहेत जेथे भाविकांनी अवश्य भेट द्यावी.

श्रीक्षेत्र पंढरपूर हे भिमा नदीच्या तीरावर आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे. याविषयी अख्यायिका सांगितली जाते की, शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले.

पुंडलिक मंदिर
भक्त पुंडलिकाचे मंदिर चंद्रभागेच्या पात्रात, महाद्वार घाटासमोर आहे. हे मंदिर चांगदेवाने बांधले आहे. मदिरामध्ये मोठा सभामंडप असुन आतिल बाजूस गाभारा आहे. गाभर्‍यातील शिवलिंगावर पुंडलिकाचा पितळी मुखवटा आहे. या मुखवट्यावर टोप घालून नाममुद्रा लावुन पुजा केली जाते.तसेच पहाटेपासुन रात्रीपर्यंत पुंडलिकाचे नित्योपचार,काकड आरती, महापूजा, महानेवैद्य,धुपारती इत्यादी करतात. महाशिवरात्रीला या ठिकाणीमोठा उत्सव असतो. चंद्रभागानदीला पूर आल्यावर पुंडलिकाचा चलमुखवटा उद्धव घाटावरील महादेव मंदिरात ठेऊन तिथे पुजा व नित्योपचार केले जातात.

लोहदंड तीर्थ
लोहदंड तीर्थ चंद्रभागेच्या पात्रात पुंडलिकाच्या मंदिरासमोर आहे. विशेष म्हणजे इथे दगडी नाव तरंगते असे म्हणतात. या तीर्थात स्नान केल्याने इंद्राच्या अंगावरील सहस्त्र छिद्रे गेली आणि इंद्राच्या हातातील लोहदंड या तीर्थात तरंगला अशी आख्यायिका आहे.

लखुबाई मंदिर
दगडी पुलाजवळ दिंडीरवनात हे मंदिर आहे. भगवान श्रीकॄष्ण जेंव्हा द्वारकेहून श्रीरुक्मिणीला शोधण्यास दिंडीरवनात आले तेंव्हा त्यांची आणि रुक्मिणीची भेट या वनात झाली.रुक्मिणी देवीचे तप करण्याचे स्थान हेच लखुबाईचे मंदिर होय.पुर्वी या मंदिराभोवती पुष्कळ झाडी होती. हे मंदिर पुर्णपणे दगडी बांधकाम केलेले असुन हेमाडपंथी पद्धतीचे आहे या मंदिरात दसरा आणि नवरात्र हे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

नामदेव पायरी
अशी आख्यायिका सांगतात की संत नामदेवांनी श्री पांडुरंगाला सांगितले की, ” हे भगवंता! मला तुमचे वैकुंठपद नको त्यापेक्षा इथे येणार्‍या सर्व भक्तांच्या पायधुळ मला लागेल अशी जागा द्या”. असे म्हणुन संत नामदेवांनी मंदिराच्या पायरीकडे बघितले तर ती भुमी एकदम दुभंगली. या वेळी भगवंत पांडुरंग संत नामदेवास म्हणाले की, ” हे नामा,तुला ही भुमी दिली. माझ्या दर्शनास येणार्‍या भक्तमंडळीची पायधुळ तुला लाभेल.” नंतर पांडुरंगास नामदेवांनी नमस्कार केला आणि त्या दुभंगलेल्या भुमीमध्ये उडी टाकली.त्याचवेळी तिथे असलेल्या संत नामदेवांच्या मंडळींनी उड्या घेतल्या. सर्व लोक बघत असतानाच भुमी एकदम पहिल्याप्रमाणे झाली. ही घटना शके 1238 आषाढ वद्य त्रयोदशीस झाली. संत नामदेवांसह त्यांच्या परिवारातील ज्या 14 जणांनी उड्या घेतल्या त्यात त्यांची आई गोणाई,वडिल दामाशेटी,पत्नी राजाई,चार पुत्र श्रीनारायण,श्रीविठ्ठल,श्रीगोविंद,श्रीमहादेव तसेच तिघी सुना गोडाई,येसाई,मखराई,मुलगी लिंबाई, बहिण आऊबाई,संत नामदेवांच्या दासी आणि शिष्या संत जनाबाई यांचा समावेश होता. या ठिकाणी पुजेकरीता सर्व लोकांनी पायरी केली आहे या पायरीस संत नामदेव पायरी असे म्हणतात.