जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात मागच्या महिन्यात झालेल्या वादळी वारा व गारपीटमुळे मोठे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. त्यातच केळीचे दर देखील घसरल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली. परंतु आता केळीच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागील महिन्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादकांना नुकसान सहन करावे लागले होते. निसवणीच्या अवस्थेतील असलेल्या नवती केळी बागांचे नुकसान झाले होते. यानंतर केळीच्या दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. किमान १००१ व कमाल २०५० आणि सरासरी १५११ रूपयांपर्यंत असलेले केळीचे भाव ४०० ते ६०० रूपयांनी खाली आले होते. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी काढणीची घाई केली. यामुळे व्यापाऱ्यांनी दर कमी केले होते.
दरम्यान अवकाळी पावसानंतर पुन्हा केळीच्या भावात सुधारणा झाली आहे. खासकरून बऱ्हाणपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १२५ ते १४० गाडी आवक होत असतानाही केळीला कमाल १८०० आणि सरासरी १४५० रूपयांपर्यंत भाव आता मिळत आहे. काही दिवसांपूर्वी येथे सरासरी ११०० रूपयांचा भाव होता. आता केळीच्या भावात साधारण ५०० रूपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे.