⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव साहेब… राज ठाकरेंवर महिला नेत्याची जहरी टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच पुण्यात घेतलेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करीत टीका केली होती. तू म्हणजे कोण? अशा भाषेत त्यांनी संभाजीनगरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरले होते. राज ठाकरे यांना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सय्यद यांनी ट्विट करीत बाळासाहेबांचे खरे वारसदार उद्धव साहेब असल्याचे त्यांनी म्हटले असून यापैकी एक तरी गुण आपल्यात आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडीला टार्गेट करीत असून अगोदर भोंगे, नंतर हनुमान चालीसा अशा मुद्द्यावरून ते टीका करीत आहेत. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी पुण्यात घेतलेल्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. संभाजी नगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, मी म्हणतो ना संभाजीनगर मग बदलण्याची काय आवश्यकता आहे. राज ठाकरे यांनी तोच मुद्दा धरून तू म्हणजे कोण? अशी टीका केली होती.

शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करीत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे भारताचे पहिल्या क्रमांकाचे सक्षम मुख्यमंत्री. बाळासाहेबांचे खरे वारसदार, शिवसेना आणि बाळासाहेब यांची शेवटपर्यंत साथ देणारे एकमेव उद्धव साहेब. असे गुणगान गात यातील एक गुण तरी आहे का राजसाहेब? असा सवाल त्यांनी केला आहे. दीपाली सय्यद यांच्या ट्विटला मनसैनिक किंवा राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.