जळगावच्या शेतकऱ्यांनो रब्बी हंगामासाठी पाणी हवंय? ‘या’ तारखेपर्यंत करा पाणी अर्ज सादर

नोव्हेंबर 2, 2021 1:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ नोव्हेंबर २०२१ । कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझण डावा कालवा, जामदा डावा आणि उजवा कालवा, निम्म गिरणा कालवा, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प व वळण बंधाऱ्यावरील अधिसुचित नदी, नाले तसेच गिरणा नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर, 2021 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

rabbi hangam

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर, 2021 पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरीचा विचार करण्यात येईल.

मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश/पाळी नसतांना पाणी घेणे/मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-यांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येऊन दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. जाहिर निवेदनामध्ये नमुद केलेल्या विहीत दिनांकापर्यत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेतली पाहिजे. शासनाने काही सवलती दिल्यास त्यानंतर जाहिर प्रकटनाव्दारे प्रसिध्द करण्यात येईल.

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. असेही कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now