जळगाव लाईव्ह न्यूज । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. समाजाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास व्हावा, या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांसह एनएएसएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र, कर्जाची वसुली अत्यल्प असल्याने मंजूर कर्जधारकांना कर्ज वितरणासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे थकीत कर्जदारांनी त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम नियमित भरणे आवश्यक आहे.

महामंडळामार्फत विशेष वसुली अभियान राबविण्यात येत असून थकीत कर्जदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याअंतर्गत कर्जदारांना वसुली भरण्याबाबत नोटीस देणे, कर्जदार व जामीनदारांच्या घरी भेटी देऊन अंतिम नोटीस देणे, सरकारी कर्मचारी जामीनदारांच्या वेतनातून कर्जाची रक्कम कपात करण्याबाबत कार्यवाही करणे तसेच मालमत्ता धारक जामीनदारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. वसुलीसाठी दिलेले धनादेश बँकेत जमा करण्यात येतील. धनादेश परत आल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाव-वस्तीत वसुली मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

महामंडळाकडून व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा गैरवापर करून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित लाभधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. थकीत कर्जदारांविरुद्ध लोकअदालतीमध्ये दावे दाखल करण्यात येणार असून, थकीत कर्जदारांच्या कुटुंबीयांनाही महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
जिल्ह्यातील कर्जदार व जामीनदारांनी होणारी कायदेशीर कारवाई व मनस्ताप टाळण्यासाठी आपल्याकडील थकीत कर्जाची रक्कम नियमित भरावी. तसेच सरकारी कर्मचारी जामीनदारांनी संबंधित कर्जदारांना थकीत कर्ज भरण्यास प्रवृत्त करून होणारी कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास जे. पगारे यांनी केले आहे.







