जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२५ । नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापले असताना या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला असून महाजन यांच्याबद्दल बोलताना दमानिया यांचा तोल सुटला.

नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया?
अंजली दमानिया म्हणाल्या की, एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की, त्यांनी नाशिकचे झाडं तोडली. लोकांनी आंदोलन करा, आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असे ते आहेत. गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा. राजकारणातून त्यांना फेकून द्या, अशा शब्दात दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे.

दरम्यान, महापालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण 1,728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील 458 झाडे वाचविण्यात महापालिकेला यश आले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, या बदल्यात मनपाच्या मलनिस्सारण विभागाने 1 कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा केला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे मनपाने स्पष्ट केले. तसेच फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड केल्याचेही सांगण्यात आले असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
याशिवाय तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1,800 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा केली आहे.











