जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या साईनगर शिर्डी ते कालका एक्सप्रेसला (गाडी क्रमांक २२४५५ व २२४५६) एक अतिरिक्त वातानुकूलित तृतीय श्रेणीचा डब्बा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. साईनगर शिर्डी-कालका एक्सप्रेसला शिर्डीपासून आज ४ ऑक्टोबरपासून तर कालकापासून २ ऑक्टोबरपासून डबा जोडला गेला आहे. त्यामुळे गाडीच्या सुधारीत संरचनेत आता बदल झाला आहे.

नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला ८ डबे वाढवण्याचा प्रस्ताव
दरम्यान नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा प्रतिसाद मिळतो आहे. आठ डब्यांची क्षमता असलेल्या या गाडीचे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गाडीला आणखी आठ डबे जोडण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे.

दिवाळीपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ही गाडी १६ डब्यांची होईल. या गाडीचे आरक्षण प्रवासी महिनाभर अगोदर करता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण सुरू होताच तिकीटे संपली. त्यामुळे या गाडीला ‘नो-रूम’ दाखवले जाते आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या रेल्वेला ८ डबे वाढवण्याची शिफारस केली आहे.












