⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

जळगाव शहर मनपाच्या घंटा गाड्यांवर होणार कारवाई

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । शहर मनपाच्या घंटागाडीच्या फिटनेस प्रमाणपत्रांची मुदत संपली असून शहरात धावणाऱ्या घंटागाड्या धोकादायक असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी केली होती. दीपक गुप्तांच्या तक्रारीची दखल घेत बुधवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कारवाईचे आदेश पारित केले आहे. आदेशामुळे उद्यापासून शहरात घंटागाड्या धावणार कि नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहर मनपाच्या घंटागाडी, स्किप लोडर, कॉम्पेक्टर हे साहित्य वॉटरग्रेस कंपनीला साफसफाईच्या कामासाठी देण्यात आले आहेत. वॉटरग्रेसला दिलेल्या १४३ वाहनांच्या फिटनेसची योग्यता प्रमाणपत्रांची मुदत डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ दरम्यान संपलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी दि.१७ डिसेंबर रोजी यांनी याबाबत परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली होती. दीपक गुप्तांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.१८ रोजी आरटीओ विभागाने दोन घंटागाड्यांवर कारवाई केली होती. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी विनंती केल्यानंतर दोन दिवस कारवाई रोखण्यात आली होती.

दोन दिवस उलटून गेल्यानंतर देखील मनपा प्रशासनाने काहीतरी पाठपुरावा न केल्याने फिटनेस मुदत संपलेली वाहने अद्यापही रस्त्यांवर धावताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी बुधवारी दिले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे मनपाची मोठी गोची होणार असून उद्यापासून शहरात घंटागाडी धावणार कि नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा :