⁠ 
रविवार, मे 19, 2024

भाव मिळत नसल्याने मुक्ताईनगरातील शेतकऱ्याने केळी बाग उपटून फेकली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मे २०२४ । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मात्र अशातच सध्या केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. केळीला भाव नाहीत. त्यात केळी कमी भावात मागितली जात असल्याने लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. यामुळे मुक्ताईनगरातील एका शेतकऱ्याने शेतातील केळी बाग जेसीबीने उपटून फेकली आहे. त्यामुळे केळी उत्पादनाचे विदारक चित्र समोर आले आहे.

एकीकडे वातावरणातील बदलामुळे पडणारे विविध कीडरोग, तर दुसरीकडे घसरणारे दर अशा दुहेरी केळी उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. परिणामी केळीला ठरलेल्या दराच्या तुलनेत यंदा निम्म्यानेही दर मिळत नाही. यामुळे हताश झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी थेट केळी बाग उपटून फेकण्याचा मार्ग निवडलेला दिसत आहे. कोथळी येथील शेतकरी सतीश चौधरी यांचे मानेगाव शिवारात शेत आहे.

१५०० खोड लावून त्यांनी केळी बाग फुलविली. खते आणि न्यूट्रिएन्टवर मोठा खर्च केला. परंतु केळी कापणीस आल्यावर व्यापारी ४०० ते ५०० रुपये दराने केळीची मागणी करीत आहेत. लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंतच्या खर्चावर कापणीचा व वाहतूक खर्च हा वरचढ ठरल्याने चौधरी यांनी थेट केळी बाग जेसीबीने उपटून फेकली आहे. आता खरिपात कपाशी लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे.

व्यापारी कमी भावाने केळी खरेदी करत आहेत. जर व्यापाऱ्यांना अशी मनमानी करायची असेल तर केळी बोर्डचे भाव काढण्याचीच गरज नाही, असा संताप शेतकऱ्यांकडून करण्यात येऊ लागला आहे. शासन किंवा प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे