⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शिवसेनेला संपविण्याचं कारस्थान रचलं गेलंय – उद्धव ठाकरे

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । शिवसेना फोडण्याचे अनेक वेळा प्रयत्न झाले. पण यावेळी मात्र शिवसेनेला संपविण्याचं कारस्थान रचलं गेलंय. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असा आशावाद व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदार माजी मंत्री गुलाबराव पाटलांना टोला हाणला.

उद्धव ठाकरे यांनी आज जळगावमधील शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिवसेना पक्षाच्या शपथपत्राचे आणि प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे घेऊन जळगावमधील शेकडो पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली. त्याच शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी जळगावचे बंडखोर नेते गुलाबराव पाटलांचा संदर्भ देऊन आपल्याला नवे गुलाब फुलवायचे आहेत, असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चेतवला.


भाजपचा वंश नेमका कोणता? सगळे रेडीमेड आहेत. हायब्रीड आहेत. भाजपवाले वंश विकत घेतायत. सध्या ज्यांना मी मोठं केलं, ते आपल्या सोबत नाहीयेत. पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू. पण आज नि:क्षून सांगतो, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नविन गुलाब फुलविन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणत्याच लढाईत आपण मागे नाही

तुमची साथ अशीच माझ्या पाठिशी राहू द्यात. पक्षसंघटनेचं काम मोठ्या जोमात करा. आपल्याला शिवसेना पक्ष सदस्य नोंदणीचं काम मोठ्या प्रमाणात करायचं आहे. आता तुम्ही शपथपत्रांचे गठ्ठे आणले आहेत, तसेच गठ्ठेच्या गठ्ठे मला हवे आहेत. गेली महिनाभर मातोश्रीवर गर्दी उसळती आहे. आपली लढाई दोन-तीन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईतही आपण मागे नाही आहोत. दिग्गज वकील आपल्यासाठी लढतायेत. कायद्याची लढाई सुरू आहे, न्याय देवतेवर माझा विश्वास आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंचं जेपी नड्डा यांना उत्तर

आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे मी आधीच बोललो होतो. परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं कि शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय, असंही ठाकरे म्हणाले.