मोठी बातमी : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांविरुद्ध देशद्रोहाचे कलम नाही, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

सप्टेंबर 26, 2022 11:00 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । गेल्या आठवड्यात राज्यातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भागात एनआयएनं छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान, टेटर फंडिंगच्या आरोपाखाली पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया एनआयएच्या रडारवर आली होती. कारवाईनंतर अनेक ठिकाणी पीएफआय समर्थकांनी निषेध व्यक्त केला होता. पुण्यात निर्दर्शने करताना पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कारवाई करण्याच्या सूचना देत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे सांगितले होते. दरम्यान, पुणे पोलिसांनी देशद्रोहाचे कलम मागे घेतले असून त्याचे कारण आता समोर आले आहे.

pakistan jindabaad

पुण्यात (Pune News) निर्दर्शने करताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवरील देशद्रोहाचे कलम मागे घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) एका जुन्या निकालाचा दाखला दिला असून त्या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पुणे पोलिसांच्या स्पष्टीकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या त्या सूचना पोलिसांनी का पाळल्या नाही हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. पोलिसांनी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले होते. पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी केल्याने राज्यभर अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता आणि कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, आता देशद्रोहाचं कलम लावण्यात न आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. टेरर फंडिंग केले जात असल्याच्या आरोपाखाली पीएफआयवर एनआयएने कारवाई केल्यानंतर राज्यात सध्या वातावरण तापले आहे. भाजपसह मनसेनंही पीएफआयविरोधात आक्रमत पवित्रा घेतला होता. त्यानंतर रविवारी राज्यभर निदर्शने देखील करण्यात आली. देशद्रोहाचे कलम न लावल्याने नवीनच वाद सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now