माझं खच्चीकरण कारण्यासाठीच भोसरीची पुन्हा चौकशी – आ.एकनाथ खडसे

जुलै 31, 2022 1:40 PM

khadse jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । एकनाथराव खडसे येत्या काळात सत्ताधाऱ्यांना जड जाऊ शकतो म्हणूनच माझ्या विरोधात मुद्दामून जुनी प्रकरण उकरून काढण्यात येत आहे. भोसरी जमीन प्रकरणात मी निर्दोष मुक्त झालो होतो. मात्र मला फक्त त्रास द्यायला माझा छळ करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल आहे अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसरी प्रकरणाबाबत अनेकदा चौकशी झाली आहे. झोटिंग समितीनेही चौकशी केली आहे. पुण्याच्या अँटी करप्शन विभागानं चौकशी करुन या प्रकरणात तथ्य नाही. हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे. नाथाभाऊ हा राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होते. नाथाभाऊ बाजूला झाला म्हणजे यांना रान मोकळं होईल. वारंवार छळण्याचा हा प्रकार आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. जनता हे सर्व पाहत आहे. भोसरी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. चुकीचं काम केलेलं नाही. भोसरी प्रकरणाची चौकशी कोणत्याही यंत्रणेने केली तरी काहीही तथ्य निघणार नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतही एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राजपालांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं अत्यंत दुर्दैवी आहे. या देशाच्या विकासात, व्यापारात सर्वाचं योगदान आहे. राज्यपालांनी अशाप्रकारे भेदभाव करणं, जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणं दुर्दैवी आहे. महामहिम राज्यपालांकडून अशी अपेक्षा नाही. ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने बोलायला हवं. हा एकप्रकारे मराठी माणसाचा अवमान आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे राज्यपालांनी हे आपलं व्यक्तिगत मत आहे, असं स्पष्ट करायला हवं, असंही खडसे म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now