⁠ 
सोमवार, सप्टेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | देशभरात ‘उज्ज्वल भारत – उज्ज्वल भविष्य’ महोत्सव २५ ते ३० दरम्यान साजरा

देशभरात ‘उज्ज्वल भारत – उज्ज्वल भविष्य’ महोत्सव २५ ते ३० दरम्यान साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२२ । देशभरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य -पॉवर @२०४७’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय, महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या सहकार्याने २५ ते ३० जुलै या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय पातळीवर देशातील ७७३ जिल्ह्यांत आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचा समावेश आहे. या महोत्सवाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध ‍विद्युत योजनाच्या माध्यमातून गावपाड्यात, शेतात ऊर्जीकरण झालेल्या लाभार्थ्यांसाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून ३० जुलै रोजी महाराष्ट्रातील नाशिक, वर्धा, कोल्हापूर, नंदूरबार आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यात लाभार्थ्यांसह देशभरातील दहा ठिकाणी व्ही.सी.द्वारे कार्यक्रम घेण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्रातील कमीत कमी एका लाभार्थ्यासोबत पंतप्रधान संवाद साधतील असा प्रयत्न राज्य शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी सध्या ऊर्जाप्रेरित झालेली गावे, स्वातंत्र्यसैनिकांची गावे किंवा ऐतिहासिक अशा ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनोजकुमार श्रीवास्तव यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांना या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासंदर्भात व्ही.सी. द्वारे मार्गदर्शन केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी जिल्हास्तरावर नोडल ऑफिसर म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सहकार्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह