जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२२ । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर शिंदे गटात हालचाली वाढल्या आहे. दुसरीकडे भाजप देखील सक्रिय झाली आहे. भाजपने सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहे. कालपासून भाजपचे बैठकांचे सत्र सुरु असून एकनाथ शिंदे गट सोबत न आल्यास विशेष अधिवेशन बोलावून बहुमताच्या बळावर सत्ता स्थापनेचा भाजपचा प्लॅन बी तयारी आहे. शनिवार किंवा रविवारी नवीन सरकार स्थापन होऊ शकते असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राज्याच्या राजकारणात गेल्या आठवडाभरापासून मोठी खळबळ उडाली असून एकनाथ शिंदे ५० आमदारांना घेऊन बंडखोरीच्या पावित्र्यात आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला असला तरी अदयाप ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. शिंदे गट भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शिवसेनेने १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्यानंतर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यावर निर्णय देत बंडखोर आमदारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ११ जुलैपर्यंत वेळ दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून पुढे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे ५० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय असेल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून या सर्व घडामोडीत कुठेही दिसून येत नसलेली भाजप सध्या बऱ्यापैकी सक्रिय झाली असून भाजपचे जेष्ठ नेते सत्ता स्थापनेबाबत सूचक वक्तव्य देखील करीत आहेत. आघाडी सरकार अस्थिर झाल्यानंतरही शिंदे गटाची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असं म्हणणाऱ्या भाजपने पडद्यामागे मात्र मोठी रणनीती आखण्याची तयारी सुरु केली होती. आता भाजपच्या गोटातील प्लॅन पूर्णपणे तयार झाला असून येत्या शनिवारी किंवा रविवारी भाजप सत्तास्थापनेच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. टाइम्स ऑफ इंडियात दिलेल्या वृत्तानुसार, भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजपमधील वरिष्ठ नेत्याने केलेल्या सूतोवाचानुसार, पुढील एक ते दोन दिवसात एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात येतील. इथे आल्यावर ते राज्यपालांसमोर ते महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेण्यासंदर्भातील पत्र राज्यपालांना देतील. तसेच महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने अविश्वास दर्शक ठरावाला त्यांनी सामोरे जावे अशी विनंती करतील. एकनाथ शिंदे गट महराष्ट्रात आलाच नाही तर भाजपने दुसरा प्लॅनही तयार ठेवला आहे. राज्यातील अस्थिर स्थिती पाहता, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावतील. या अधिवेशनात भाजप फ्लोअर टेस्टसाठी विनंती करेल. मात्र या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व आमदार गैरहजर राहतील, याची काळजीही भाजपकडून घेतली जाईल. ५० पेक्षा जास्त आमदार फ्लोअर टेस्टला गैरहजर राहिले तरीही महाविकास आघाडी सरकार कोसळेल.
भाजपने आखलेल्या प्लॅननुसार जर सर्व सुरळीत चालले तर येत्या शनिवार किंवा रविवारपर्यंत राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. भाजपच्या प्लॅन प्रमाणे दोन्हीमध्येही फ्लोअर टेस्ट ही घेतलीच जाणार आहे. यंदा मात्र भाजप पुरेशा संख्याबळाने पुढे येणार असून अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या फडणवीस आणि अजित पवारांच्या युतीसारखी चूक यावेळी होणार नाही, याची खबरदारी भाजपतर्फे घेतली जात आहे, असेही भाजपमधील सूत्रांनी सांगितले. भाजपने अपक्ष आमदार देखील हाताशी जुळवून ठेवले असून सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या कोअर कमिटीच्या महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. उच्चस्तरीय नेत्यांकडून तयारी सुरु करा म्हणण्याची वाट पाहिली जात आहे. तसं तर सुप्रीम कोर्टानं सोमवारी एकनाथ शिंदे गटाकडून कौल देत बंडखोर आमदारांना म्हणणे सादर करायला ११ जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे गट भाजप किंवा मनसेत विलीन होण्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर उत्तर देताना भाजपचे वरिष्ठ नेते म्हणाले, एकनाथ शिंदे हेच शिवसेना विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे ते भाजपा किंवा मनसेत शामील होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.












