जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर पोलिस दलाने वाढवला आहे. यात सायबर पोलिस ठाणे, फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल करणे सोपे झाले आहे. तर आता संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ९९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ३२ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. तसा पोलिस दलाने पाठवला आहे.

जिल्ह्यात अनेक तालुके, गाव संवेदनशील आहेत. या भागात दंगली, खून, प्राणघातक हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे वाढले आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस दलात पुरेशी कुमक नाही. अनेक पोलिस ठाण्यांमध्ये क्षमतेपेक्षा कमी मनुष्यबळ आहे. अशात तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यपातळीवर नियोजन सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात गतवर्षी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी डीपीसीतून निधी उपलब्ध होणार होता; परंतु काही कारणास्तव निधी आला नाही. त्यामुळे आता ९ फेब्रुवारी रोजी सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव डीपीसीकडून राज्यशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यात ठिकठिकाणी १ हजार ९९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. पैकी सर्वाधिक ४४० कॅमेरे जळगाव शहरात बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी ७ कोटी ८१ लाख रुपये खर्च येणार आहे. या कॅमेऱ्यांच्या कक्षेतून सर्वच हालचालींवर पोलिसांना नजर ठेवता येणार आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीसाठी जिल्हा, तालुक्यांच्या ठिकाणी स्वतंत्र नियंत्रण कक्ष असणार आहे.

खून, जबरीलूट, गँगवॉर वाढल्याने भुसावळावर लक्ष
जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येच्या भुसावळ शहर व तालुक्यात खून, जबरीलूट, गँगवारच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिस दलाने अधिक लक्ष दिले आहे. भुसावळ शहरात एकूण १८८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी २ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. उर्वरित जिल्ह्यात २२ कोटी रुपये खर्च करून १,३६५ कॅमेरे बसवण्यात येतील, असे जिल्हा पोलिस यंत्रणेने सांगितले.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






