जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच तब्बल अडीच वर्षापासून महाराष्ट्रात मोठी मेगा पोलीस भरती करू असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात कोरोना महामारी, माजी गृहमंत्र्यांवर झालेले आरोप तसेच अन्य कारणांमुळे पोलीस भरती प्रक्रिया रखडली गेली. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुन्हा एकदा 7200 पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले.

चाळीसगावमध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. आणि पोलीस भरतीच्या मैदानी सरावासाठी चाळीसगावात एकमेव मोठे मैदान म्हणजे के.आर. कोतकर कॉलेजचे मैदान आहे. यालाच ट्रॅक या नावाने देखील ओळखले जाते. मात्र या मैदानावर पोलीस भरती करणाऱ्या तरुणांपेक्षा वयोवृद्ध लोकांची गर्दी, ज्येष्ठ नागरिक, तसेच क्रिकेट खेळाडू, आणि अन्य खेळ खेळणारी मुले यांची संख्या खूप जास्त प्रमाणात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या मैदानाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. याचा परिणाम पोलीस भरती करणाऱ्या तरुणांना मोठा अडसर निर्माण होतो. वयोवृद्ध लोक या मैदानाच्या धावपट्टीवर चालत असतात. त्यामुळे रनिंग करतांना तरुणांच्या नाकीनऊ येते. पोलीस भरती करणाऱ्या तरुणांनी या वयोवृद्ध लोकांना बाजूला चालल्यास सांगितल्यावर हे लोक तरुणांना दमदाटी करतात. तसेच उद्धट भाषा वापरतात. या वयोवृद्धांची गर्दी तरुणांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. सकाळ संध्याकाळ होणाऱ्या गर्दीला कंटाळून बरेच तरुण दुपारी भर उन्हात सरावासाठी मैदानावर जातात.

वयोवृद्ध लोकांनी या तरुणांच्या भविष्याचा विचार करून शक्यतो या मैदानावर येण्याचे टाळावे, फिरण्यासाठी दुसऱ्या पर्यायी जागेचा आणि रस्त्यांचा वापर करावा अशी मागणी चाळीसगाव शहरातील आणि तालुक्यातील हजारो पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून होत आहे. याकडे कॉलेजचे प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ आणि चाळीसगावातील लोकप्रतिनिधींनी देखील ताबडतोब लक्ष घालण्याची गरज आहे. आणि वयोवृद्ध लोकांनी देखील किमान पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत का होईना समजदार पणा दाखवण्याची गरज आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






