रियालिटी चेक : दीड टन गांजा जळगावात नव्हे नांदेड जिल्ह्यात पकडला

नोव्हेंबर 15, 2021 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावकरांची झोप उडवणारी बातमी सोमवारी सकाळीच कानावर धडकली. एरंडोल तालुक्यात १५०० किलो गांजा पकडल्याची बातमीने सर्व प्रशासन कामाला लागले. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता गांजा जळगावात पकडल्याचे अद्याप कुठेही माहिती किंवा नोंद नसल्याचे सांगत अधिक माहिती घेत असल्याचे त्यांनी जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले. दरम्यान, गांजा नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडण्यात आला असून तो एरंडोल येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Reality Check jpg webp

देशभर गेल्या काही दिवसांपासून गांजा आणि मादक पदार्थांची मोठी चर्चा सुरु आहे. आर्यन खान प्रकरण काहीसे थंड होत नाही तोच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. ANI वृत्तसंस्थेने सोमवारी सकाळी ट्विट केले असून जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ मुंबई एनसीबीच्या पथकाने तब्बल १५०० किलो गांजा पकडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जळगावात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याची बातमी समोर आल्याने सर्वच खळबळून जागे झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला याबाबत अद्याप काहीही माहिती नसून एरंडोल प्रशासन देखील कारवाईपासून अनभिज्ञ आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी जळगाव लाईव्हने संपर्क साधला असता, गांजा पकडल्याची कारवाई जळगावात झाली नसून संबंधित पोलीस ठाणे, अपर पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गांजा पकडल्याची कारवाई नांदेड जिल्ह्यात झाली असल्याची माहिती असून याबाबत अधिक माहिती घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिषेक शिंदे यांच्याशी जळगाव लाईव्हने याबाबत संपर्क साधला असता ‘आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झालेली आहे परंतु ती मुंबईच्या पथकाने केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा गांजा एरंडोल येथे जात असताना रस्त्यातच पथकाने पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नांदेड पोलिसांनी जळगाव लाईव्हला दिलेल्या पुष्टीमुळे जळगाव जिल्ह्याचे नाव पुन्हा बदनाम होण्यापासून वाचले आहे. परंतु नायगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे गांजा एरंडोल येथे कुणाकडे येणार होता आणि पुढे कुठे जाणार होता? हा प्रश्न उभा राहिला आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now