जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । पाय घसरून नदीपात्रात पडलेल्या १२ वर्षीय मावसभावाला वाचवताना त्याची ११ वर्षीय बहिणीचा सुकी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाल (ता.रावेर) येथे गुरुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. अंजूम शेख जावेद (वय ११) असे मृताचे नाव असून ती विवरे येथील रहिवासी आहे.

याबाबत असे की, पाय घसरून नदीपात्रात पडलेल्या १२ वर्षीय मावसभावाला वाचवताना त्याची ११ वर्षीय बहीण सुकी नदीत पडली. हा प्रकार पाहून अंजूमची आई, आजी व मामीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी एकमेकांचे हात सुटून त्यांचेसोबत असलेले इतर ७ लहान मुले देखील नदीत पडून गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच बाजूलाच असलेल्या तीन मासेमारांनी मदतीसाठी धाव घेत सर्व १० जणांना बाहेर काढून जीवदान दिले. मात्र, दुर्दैवाने अंजूमचा बुडून मृत्यू झाला.

अंजूम आणि तिची आई हुरबानो शेख जावेद, दोन भाऊ साद आणि उमेर, शमीमबानो (आजी), वरणगाव येथील मामी शाहिस्ताबी फजल्लोदीन, शाहिस्ताबीची दोन मुले अनुक्रमे मुलगी अमन व मुलगा अलफैज असे ८ जण गुरुवारी विवरे येथून पाल येथील नातेवाईक अकबर शेख शब्बीर (अंजूमचे मावसा) यांच्याकडे गेले. तेथून अकबर यांची तीन मुले अनुक्रमे जिशान (वय १२, अंजूमचा मावसभाऊ), सारा आणि अलिया (मावसबहीणी) असे ११ जण पाल येथील हरीण पैदास केंद्र पाहायला निघाले. सुकी नदी आणि कुसुंब्री नाल्याचा संगमावर ही घटना घडली.











