जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेला कोरोना महामारीचा काळ त्यात बिबट्याची दहशत असताना चोरट्यांनी घातलेला धुमाकूळ यामुळे वरखेडे परिसरात शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. एकापाठोपाठ एक गुरे चोरीला जाण्याच्या घटना घडत असून या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.काल वरखेडे मध्ये पुन्हा बैल व दोन गाई चोरीस गेल्या. त्यामुळे शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत आहे. रात्री अपरात्री केव्हाही नागरिकांना बिबट्याचे दर्शन होते. मध्यंतरी बिबट्याने हिंस्त्र प्राण्यांसह वासरे, बकरे यांचा फडशा पाडला होता. परिसरात बिबट्याचा लपंडाव सुरू असल्याने भयभीत झालेले नागरिक रात्री शेतात गुरांचे राखण करण्यासाठी धजावत नाहीत.
परिणामी याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला आहे. गेल्या चार सहा महिन्यात वरखेडे भागात गुरे चोरीच्या काही घटना घडल्या आहेत. भरधाव वाहनातून आलेले चोरटे पहाटेच्यावेळी डाव साधतात. व रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामधील दावणीला बांधलेले गुरे चोरून नेतात. व त्याच रस्त्याने भरधाव वेगाने धूम ठोकतात.
काल रोजी जयसिंग हरिसिंग कछवा यांच्या शेतातील दावणीला बांधलेले एक बैल, व दोन गाई चोरट्यांनी चोरून नेले. कच्छवा हे काल सकाळी शेतात आल्यानंतर एक बैल व दोन गाई बेपत्ता झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी आसपास गुरांचा शोध घेतला पण मिळून आली नाही. घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. दरम्यान या घटनेमुळे कच्छवा यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.