जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज (शनिवार) सायंकाळी 5.00 वाजेपासून वाघूर धरणातून 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे वाघुर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे.

जिल्ह्यात पावसाने सुरुवातीचे दोन ते अडीच महिने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. मात्र, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा वाढला आहे. काही धरणांमधून [पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

दरम्यान, आज सायंकाळी वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रामध्ये कोणीही गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.
दरम्यान, विकेंडनंतर राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे.
रविवारी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.








