⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कालनिर्णयकार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेश महामंडळाची स्थापना

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक १९८५ मध्ये सुरु झाल्यानंतर काही वर्षातच मिरवणुकीला गालबोट लागले. मिरवणुकीची परंपरा खंडित होईल का? असा प्रश्न समोर उभा असताना काही तरुण पुढे सरसरवाले. अखिल भारतीय सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर (कालनिर्णयकार), श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंडळांचे संघटन असावे असा विचार पुढे आला.

जळगावात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठया थाटामाटात सुरु करण्यात आली होती. जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आणि सर्वच ठप्प झाले. दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाल्याने पुढे काय? असा प्रश्न उपस्थित राहिला. १९८८ ला विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्यावर १९८९ ला सचिन नारळे, किशोर भोसले आणि मुकुंद मेटकर या तरुणांनी पुणे येथे जाऊन अखिल भारतीय सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर कालनिर्णयकर तसेच श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांची भेट घेऊन जळगाव परिसरातील गणेशोत्सवबाबत चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले.

मिरवणुकीत केवळ ७ मंडळांचा सहभाग
पुणे येथे साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि दोन्ही जेष्ठांचे मार्गदर्शन ऐकून त्याबाबत जळगावात चर्चा विनिमय केल्यावर मंडळांचे संघटन असावे असा विचार पुढे आला. चर्चा सुरु असताना त्याच कालखंडात मिरवणूक पुन्हा सुरु झाली परंतु मिरवणुकीचा मार्ग देखील कमी झाला आणि तेव्हा जुनी मनपा इमारत ते घाणेकर चौक केवळ ७ गणेश मंडळांनी मिरवणुकीत सहभाग नोंदविला.

अर्ध्यातच सोडली सहविचार सभा
१९९४ मध्ये दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुन्या जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून गणेश मंडळांची सहविचार बैठक बोलाविण्यात आली. राज चाफेकर हे पोलीस अधिकारी अध्यक्षस्थानी होते. गणेशोत्सव संदर्भात चर्चा सुरु असताना काही मुद्दे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना खटकले. आपला उत्सव, आपली आचारसंहिता असावी या विचाराने बैठक अधर्वट सोडून सचिन नारळे यांच्यासह काही कार्यकर्ते खाली उतरले आणि तिथेच सार्वजनिक गणेश महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला.

डॉ.अविनाशदादा आचार्य झाले संस्थापक अध्यक्ष
जळगावात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेणारे जेष्ठ मार्गदर्शक डॉ.अविनाशदादा आचार्य यांची संस्थापक अध्यक्ष निवड झाली. डॉ.आचार्य यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून सचिन नारळे यांची नियुक्ती केली. १९९४ मध्ये सार्वजनिक गणेश महामंडळाची स्थापना होऊन गणेशोत्सवात खरा बदल झाला. महामंडळाने स्वतःची आचारसंहिता आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. पहिला बदल १९९५ मध्ये दिसून आला. सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीत होणारी गुलालाची उधळण बंद करून फुलांची उधळण सुरु झाली. तेव्हापासून गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतःवर आदर्श आचारसंहिता लादून घेतली आहे.