
जळगाव लाईव्ह न्युज | १ सप्टेंबर २०२१ | महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन जळगाव राज्यांना जोडणाऱ्या मलकापुर-बऱ्हाणपुर महामार्गावरील मौजे सुकळी गावानजिक पुलावर भला मोठ्ठा जिवघेणा खड्डा पडलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरत असल्याने खड्ड्याच्या खोलीचा नेमका अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अनेक अपघात या ठिकाणी घडत आहे.वाहनधारक व ग्रामस्थांनी वेळोवेळी यासंदर्भात सा.बा.मुक्ताईनगर यांचेकडे तक्रारी देवुनही अद्यापपर्यंत खड्डा बुजविण्यात आलेला नाही.

सुमारे दोन महीन्यापुर्वी सुकळी येथील दोन युवकांनी यासंदर्भात थेट खड्ड्याची फोटोप्रिंट काढुन मुक्ताईनगर येथील सा.बांधकाम विभागात अर्ज दाखल केला तरी आजरोजी दोन महीने उलटले मात्र संबधित अधिकारी यांना काहीही फरक पडलेला नसुन अद्यापपर्यंत हा धोकेदायक जीवघेणा खड्डा बुजविण्यात आला नसल्याने जनमाणसांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.अनेकांनी वेळोवळी तक्रारी देवुनही संबंधित अधिकारी तक्रारीची दखल का घेत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला असुन संबंधित अधिकारी यांना कुणाचे अभय तर नाहीना अशी शंका उपस्थित केली जात आहे.








