⁠ 
शनिवार, मे 18, 2024

हृदयद्रावक ! बहिणीला भेटून परतताना भीषण अपघात; दोन जण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२१ । बहिणीला भेटून गावी परतत असताना दोन दुचाकी एकमेकांना धडकल्या. या अपघातात दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी शेंदूर्णी ते गोंदेगाव दरम्यान असलेल्या ऋषीमंदिर परिसराजवळ घडली. दीपक रामदास गायकवाड (वय २५ , रा. गटामरी, ता. सिल्लोड, औरंगाबाद) व दिनेश मदन जाधव (वय २३, रा. गोंदगाव तांडा, शेंदूर्णी) अशी मृतांची नावे आहेत. तर कृष्णा उत्तम सोनवणे (रा. डकला, ता. सिल्लोड, औरंगाबाद) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत असे कि, मृत दीपक व जखमी कृष्णा हे दोघे एकमेकांचे आतेभाऊ- मामेभाऊ आहेत.  हे दोघे दुचाकीने (एमएच २० डीके २५४८) रविवारी दीपकची बहिण राधाबाई (जोगलखेडा) हिला भेटण्यासाठी आले होते. परत जात असताना त्यांच्या दुचाकीची धडक दिनेश जाधव याच्या दुचाकीस धडकली. या अपघातात दीपक व दिनेश या दोघांचा मृत्यू झाला. तर कृष्णाच्या डाव्या पायास व डोक्यास दुखापत झाली.

नागरीकांनी या तिघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दोन्ही मृत व जखमींचे नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. रात्री ११.३० वाजता दोन्ही मृतदेह शवागारात नेण्यात आले होते. तर जखमी कृष्णा याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दीपक हा शेतीकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.

या अपघातात मृत झालेला दीपक गायकवाड याच्या पश्चात पत्नी उषा, गणेश, हितेश व दिनेश हे तीन मुले व निकीता ही एक मुलगी आहे. या दुर्देवी अपघातात या चारही मुलांचे छत्र हरपले आहे.