जळगाव लाईव्ह न्यूज । महागाईचा भडका सर्वसामान्यांची पाठ सोडताना दिसत नसून त्यातच गेल्या पंधरवड्यात साखरेच्या भावाने नवा उच्चांक गाठला आहे. त्यापाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखर आणि गुळाची मागणी वाढली असतानाच दरवाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

काय आहेत साखर, गुळाचे दर?
साखरेच्या दरात सातत्याने वाढ होऊन शुक्रवारी हे दर ७० रुपये किलोवर पोचले आहेत. या पाठपोठ आता गुळाचेही दर वाढले आहेत. गेल्या पंधरवड्यापूर्वी ५२ किलोवर असलेले गुळाचे दर सध्या २५ रुपयांनी वाढून ७७ रुपये किलोवर पोचले आहेत.

साखरेचे दर का वाढले?
साखरेच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. यंदा देशातील साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालंय. त्यातच सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढलीये. गारपीट, पाऊस आणि इतर हवामानातील बदलांमुळे काही भागांत ऊस पिकांचं नुकसान झालंय. या सर्वांचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला. याशिवाय जगभरातील साखरेचा पुरवठा कमी झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर वाढले आहेत. काही व्यापारी आणि उद्योगातील घटकांकडून साठेबाजी तसंच सट्टेबाजी होत असल्याचाही सरकारने आरोप केलाय. या कारणांमुळे देशातील साखरेच्या किमतीवर दबाव वाढला असल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे.
सरकारच्या माहितीनुसार, यंदाच्या साखर हंगामात देशात सुमारे 306 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला हे उत्पादन 343 लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. म्हणजेच सुरुवातीच्या अंदाजापेक्षा उत्पादन लक्षणीय कमी झालंय. मात्र उत्पादन घटलं असलं तरी देशातील घरगुती गरज भागवण्यासाठी पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध आहे, असा सरकारचा दावा आहे.
दरम्यान, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत साखर, गुळ आदींना मागणी वाढत आहे. याच काळात सारखेसह गुळाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. राखी पौर्णिमेपासूनच प्रत्येक घरात साखर व गुळाचा वापर वाढतो. याच काळात होणारी दरवाढ इतर पुरक वस्तूंचे वाढवण्यासाठीही कारणीभूत ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मागणीत वाढ, साठेबाजीही वाढत असल्याने आगामी काळात साखर व गुळाचे दर राहण्याचा अंदाज आहे.








