रेल्वेचा मेगा ब्लॉक; जळगाव, भुसावळ मार्गे धावणाऱ्या ‘या’ १४ गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

ऑगस्ट 5, 2026 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भादली–जळगाव दरम्यानच्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी भादली स्थानकाच्या यार्डाची पुनर्रचना तसेच नॉन-इंटरलॉकिंगचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ११ ते १४ ऑगस्टदरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. या कालावधीत १४ गाड्या पूर्णपणे रद्द, दोन एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून, अनेक महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या १ ते ३ तासांपर्यंत विलंबाने धावणार आहेत.

blockrailway

या १४ गाड्या राहणार रद्द

१२ ऑगस्ट रोजी नंदुरबार-भुसावळ, भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर, नाशिकरोड-बडनेरा व बडनेरा-नाशिकरोड विशेष, इगतपुरी-भुसावळ, भुसावळ-इगतपुरी, देवळाली-भुसावळ, भुसावळ-देवळाली मेमू, दादर-भुसावळ व भुसावळ-दादर विशेष तसेच भुसावळ-कटनी विशेष या गाड्या पूर्णपणे रद्द राहतील. याशिवाय ११ ऑगस्टची सुरत-भुसावळ, १४ ऑगस्टची भुसावळ-सुरत आणि कटनी-भुसावळ एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.

दोन एक्स्प्रेसचे मार्ग बदलले

गाडी क्रमांक १७०१९ हिसार–हैदराबाद एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२७१६ अमृतसर–नांदेड एक्स्प्रेस या गाड्या त्यांच्या नियमित मार्गाऐवजी भुसावळ सी केबिन (कॉर्ड लाइन)–अकोला–पूर्णा मार्गे धावतील. त्यामुळे या मार्गावरील काही स्थानकांवरील प्रवाशांनी वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक एक्स्प्रेसना विलंब

१२ ऑगस्ट रोजी बंगळुरू-नवी दिल्ली, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर, यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन, सीएसएमटी-आसनसोल, एलटीटी-जयनगर, अमृतसर-सीएसएमटी, गोरखपूर-एलटीटी, जयनगर-एलटीटी, गोंदिया-कोल्हापूर, बनारस-हडपसर अमृत भारत आणि एमजीआर चेन्नई सेंट्रल-भगत की कोठी एक्स्प्रेस या गाड्यांना विविध स्थानकांवर १ तास ५ मिनिटांपासून ते ३ तासांपर्यंत विलंब होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 22590 हडपसर-बनारस एक्स्प्रेस ही १२ ऑगस्ट रोजी नियोजित सकाळी ७.५० वाजण्याऐवजी सकाळी १०.२० वाजता हडपसर येथून सुटणार आहे.

भविष्यात रेल्वे वाहतुकीला मोठा फायदा

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भादली स्थानकावरील नॉन-इंटरलॉकिंग आणि भादली-जळगाव पाचव्या रेल्वे मार्गाच्या जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. तसेच गाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्याबरोबरच रेल्वे संचालन अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची सद्यस्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now