जळगाव लाईव्ह न्यूज । मान्सूनच्या सुरुवातीला दडी मारून शेतकऱ्यांना चिंताक्रांत करणाऱ्या पावसाने आता संपूर्ण राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली, जालना तसेच जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आणि जळगाव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली असली तरी जुलै महिन्यातील दमदार हजेरीमुळे पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुन्हा मान्सून सक्रिय झाल्याने जळगाव जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.
तसेच, आगामी पावसाच्या सरींमुळे जळगावची जीवन वाहिनी असलेल्या हतनूर धरणातील जलसाठ्यात वाढ होण्याची प्रबळ शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जून महिन्यात पावसाने दडी मारली असली तरी जुलै महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. आता पुन्हा सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार असून जळगाव जिल्ह्यामधील धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.








