जळगाव लाईव्ह न्यूज । मेंदूला सूज येऊन गंभीर स्वरूपाचा एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झालेल्या १३ वर्षीय बालकावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी वेळेत निदान करून अत्याधुनिक उपचार केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या या बालकाच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या टीमने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे बालकाची प्रकृती सुधारली आहे.

यावल तालुक्यातील १३ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून तीव्र ताप होता. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तसेच वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तो बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल होताच बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे लक्षात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोणताही विलंब न करता त्याला अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले. त्याचबरोबर आवश्यक रक्ततपासण्या, मेंदूच्या कार्याचे मूल्यमापन आणि एमआरआय तपासणी तातडीने करण्यात आली.एमआरआय अहवालात मेंदूला सूज आल्याचे स्पष्ट झाले.

तपासणीअंती बालकाला एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झाल्याचे निदान झाले. हा आजार अत्यंत गंभीर असून वेळेत उपचार न झाल्यास जीवाला धोका निर्माण होण्याबरोबरच कायमस्वरूपी मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय पथकाने तातडीने आवश्यक औषधोपचार, झटके नियंत्रित करणारी औषधे, संसर्गावर उपचार तसेच अतिदक्षता विभागातील सर्व आवश्यक उपचार सुरू केले. बालरोग तज्ज्ञांसह डॉ. नावेद, डॉ. मिमोनी, डॉ. निशीगंधा यांच्यासह अतिदक्षता विभागातील डॉक्टर, भूलतज्ज्ञ, परिचारिका यांनी रात्रंदिवस बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. उपचारादरम्यान प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने डॉक्टरांच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
अखेर उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला. मेंदूची सूज कमी झाली, झटके थांबले आणि बालकाची शुद्ध परत आली. त्यानंतर हळूहळू त्याला व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे बरा आहे. यशस्वी उपचारानंतर बालकाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर आणि संपूर्ण रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
एन्केफेलायटीस म्हणजे मेंदूला आलेली सूज हा अत्यंत गंभीर आजार आहे. ताप, तीव्र डोकेदुखी, वारंवार झटके, बेशुद्धावस्था, गोंधळलेली मानसिक अवस्था किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत निदान व योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते.
- डॉ. मिमोनी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय









