जळगाव लाईव्ह न्यूज । एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात १३.५६ टक्के वाढ केली असून या भाडेवाढीनंतर जळगावहून पुणे, मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २५ ते २७ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. तसेच जिल्ह्यांतर्गत विविध तालुक्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी १ ते ५ रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. हे नवे दर १८ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या किमतीत झालेली वाढ, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, टायर व देखभाल खर्चातील वाढ या सर्वांचा विचार करून भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

ही वाढ साधी लाल बस, विनावातानुकूलित बस आणि शयन-आसन बस सेवांवर लागू करण्यात आली आहे. मात्र ई-बस आणि शिवशाही बसच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच सर्व सेवांमध्ये अंतिम भाडे पाच रुपयांच्या पटीत निश्चित करण्यात आले आहे.
जळगाव आगारातील काही प्रमुख मार्गांचे नवीन भाडे
पुणे : ₹७६५ वरून ₹७९० रुपये
धुळे: ₹१८० वरून ₹१८५ रुपये
नाशिक: ₹४७८ वरून ₹४९५ रुपये
छत्रपती संभाजीनगर: ₹३१२ वरून ₹३२० रुपये
मुंबई: ₹८४३ वरून ₹८७० रुपये
जामनेर: ₹८० वरून ₹८५ रुपये
पाचोरा: ₹१०२ वरून ₹१०५ रुपये
चाळीसगाव: ₹१९१ वरून ₹१९५ रुपये
अमळनेर: ₹१२५ वरून ₹१३० रुपये
चोपडा: ₹१२५ वरून ₹१३० रुपये
यावल: ₹९१ वरून ₹९५ रुपये
रावेर: ₹१४७ वरून ₹१५० रुपये
मुक्ताईनगर: ₹१२५ वरून ₹१३० रुपये
भुसावळ: ₹५८ वरून ₹६० रुपये
एरंडोल: ₹६९ वरून ₹७० रुपये
पारोळा: ₹११३ वरून ₹११५ रुपये







