कच्चे तेल स्वस्त झाले, तरी भारतात महागाईचा भडका उडणार? पाहा काय आहे कारण?

जून 20, 2026 1:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक महिन्यांपासून मध्य पूर्वेतील युद्ध आणि जागतिक तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली होती. यामुळे जागतिक तेल आणि वायू पुरवठा साखळी विस्कळीत होऊन आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $100 ते $110 च्या पार गेले होते. याचा थेट फटका भारतातील पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांना बसला, ज्यामुळे वाहतूक खर्च वाढून देशात महागाईचा भडका उडाला होता.

mahagai

परंतु, आता अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाल्यामुळे युद्ध थांबले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली झाल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत असून, ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल $77 पर्यंत खाली आले आहेत. तरीही, भारतातील सर्वसामान्यांचे मासिक बजेट सुधारण्याची चिन्हे दिसत नाहीत. अर्थतज्ज्ञांच्या मते, आता महागाई वाढण्यामागे कच्चे तेल नसून एक वेगळाच ‘खलनायक’ कारणीभूत ठरणार आहे.

महागाईचे नवे आकडे चिंताजनक

कच्च्या तेलाच्या आधीच्या दरवाढीमुळे भारतातील किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) एप्रिलमधील ३.४८% वरून मे महिन्यात ३.९३% वर पोहोचला आहे. यामध्ये अन्नधान्य आणि इंधनाच्या किमतींनी मोठी भूमिका बजावली. दुसरीकडे, मे महिन्यात घाऊक महागाईचा दर (Wholesale Inflation) तब्बल ९.६८% च्या उच्चांकावर गेला आहे. या वाढत्या धोक्याची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष २०२७ साठीचा आपला महागाईचा अंदाज ४.६% वरून थेट ५.१% पर्यंत वाढवला आहे.

तेल नाही, तर ‘मान्सून’ आहे महागाईचा खरा विलन!

कच्चे तेल स्वस्त होऊनही महागाई का कमी होत नाही? यावर ‘इन्फोमेरिक्स रेटिंग्स’चे मुख्य अर्थतज्ज्ञ यांनी एक धक्कादायक विश्लेषण समोर आणले आहे. त्यांच्या मते, “आज भारतासमोरील महागाईचा सर्वात मोठा धोका तेल नसून मान्सून आहे.” भारताच्या महागाईच्या गणनेत इंधनाच्या किमतींपेक्षा अन्नधान्याच्या किमतींचा वाटा खूप मोठा आहे. भारतातील जवळपास निम्मी शेती अद्यापही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. कमी पावसामुळे धान्य, कडधान्ये, भाजीपाला, फळे आणि तेलबियांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

मासिक खर्च ३,००० ने वाढणार?

तज्ज्ञांच्या मते, कमी पावसामुळे, विशेषतः ‘एल निनो’च्या (El Nino) प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन किमती गगनाला भिडतात. अशा परिस्थितीत भाजीपाला, डाळी, खाद्यतेल आणि दुधाचे भाव दुहेरी अंकात (Double Digit) वाढण्याची शक्यता असते. याचा थेट परिणाम मध्यमवर्गीय शहरी कुटुंबांवर होईल, ज्यांच्या मासिक घरगुती खर्चात १,००० ते ३,००० रुपयांची मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाचे सावट टळले असले, तरी देशांतर्गत पातळीवर मान्सूनच्या लहरीपणामुळे देशातील जनतेला महागाईच्या आणखी एका तीव्र झळा सोसाव्या लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now