जळगाव लाईव्ह न्यूज । उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील खासदार फुटीच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

ठाकरे गटातील खासदार फुटीच्या प्रश्नावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “खासदार संजय राऊत यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे सेनेची पूर्णपणे अधोगती झाली आहे. संजय राऊत हा पांढऱ्या पायाचा (अपशकुनी) माणूस आहे. आता या माणसाचा पांढरा पाय काळा कसा होईल, हेच आम्हाला पाहायचे आहे.”
दुसरीकडे, दिल्लीतील या मोठ्या राजकीय भूकंपानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा संताप अनावर झाला. ६ खासदारांनी साथ सोडल्याचे स्पष्ट होताच राऊतांनी पक्ष सोडून जाणाऱ्या खासदारांना थेट शेलकी शिवी हासडली. “पहिल्या पक्षफुटीनंतरही शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढली होती. आता जनताच या फुटीर खासदारांना रस्त्यावर जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा संतप्त इशारा राऊतांनी दिला.
दरम्यान, ठाकरे सेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी बंडखोरी केली असून या खासदारांनी संसदेत आपला स्वतंत्र गट स्थापन केला आहे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला मंजुरी दिल्याचेही समोर आले आहे. आता हा फुटीर खासदारांचा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सर्व घडामोडींवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.








