जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. किरकोळ बाचाबाचीनंतर झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सागर अरुण बिऱ्हाडे (वय ३२) असं मयत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे येथील जुन्या मारुती मंदिर परिसरात गुरुवारी रात्री सासुरवाडी येथे राहण्यासाठी गेलेल्या सागर बिऱ्हाडे आणि एका संशयित व्यक्तीमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, या मारहाणीत सागरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जमिनीवर कोसळला आणि जागेवरच सागरचा दुर्देवी मृत्यू झाला.

सागरला मारहाण केल्यानंतर तो जमिनीवर कोसळल्याने संशयित मारेकरीत तेथून पसार झाले दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सागरला बेशुद्ध अवस्थेत पाहून गावातील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. गावातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मयत सागरच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी संशयितांच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे.









