आवक घटताच केळीचा भाव वाढला; आता प्रति क्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव?

डिसेंबर 4, 2025 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी २०० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल भाव असलेल्या केळी दरात आता सुधारणा झाली आहे. आवक घटल्याच्या स्थितीत बाजारात तुटवडा निर्माण होताच व्यापाऱ्यांसमोर केळीचे भाव वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय आता राहिलेला नाही. यामुळे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात केळीला जवळपास १००० रूपयांपर्यंतचा भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्याला किंचित दिलासा मिळाला असून हे भाव कायम राहतात, वाढतात की पुन्हा कमी होतात, याकडे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

banana

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून केळी दरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आले. लाखो रूपये खर्च करूनही हाती काही मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान झाले. बोर्डावर चांगला भाव असला तरी व्यापारी कमी दरात केळी खरेदी आहे. मागच्या काही दिवसापूर्वी केळीला अवघा २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत होता. त्यातून उत्पादन व मजुरीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहिले नाही.

दरम्यान, बऱ्हाणपुर बाजार समितीत दोन महिन्यांपूर्वी १० टन क्षमतेच्या १५० गाड्यांची आवक सुरू होती. परंतु, त्या ठिकाणी आजच्या घडीला जेमतेम २५ ते ३० गाडी केळीची आवक दररोज होत आहे. आवक घटल्याच्या स्थितीत बाजारात तुटवडा निर्माण होताच व्यापाऱ्यांसमोर केळीचे भाव वाढविण्याशिवाय दुसरा पर्याय आता राहिलेला नाही. त्यामुळेच बुधवारी बऱ्हाणपुरात केळीला किमान ७७१ आणि कमाल १००१ रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला.

गेल्या काही महिन्यांचा अनुभव लक्षात घेता केळीला आता मिळालेला भाव आणखी वाढतो की घटतो, याकडे शेतकरी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सध्याच्या घडीला मृग बागांमधील केळीची काढणी आटोपली असली, तरी कांदे बागांमधील केळीची काढणी सुरू आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे निसवणीवर परिणाम झाल्याने केळीची आवक म्हणावी तशी नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now