जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२५ । जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणाऱ्या उधना-ब्रम्हपूर अमृत भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असून ज्याचा मोठा फायदा भुसावळसह जळगाव, धरणगाव आणि अमळनेरहून गुजरात जाणाऱ्या प्रवाशांना होऊ शकणार आहे.

उधना ते ब्रम्हपूर दरम्यान धावणारी अमृत भारत एक्सप्रेस उधना स्थानकावरून सकाळी ०७.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०१.५५ वाजता ब्रम्हपूरला पोहोचते. त्याचप्रमाणे, ब्रम्हपूरहून उधनाच्या दिशेने धावणारी ही एक्सप्रेस सहा ऑक्टोबरपासून प्रत्येक सोमवारी रात्री ११.४५ वाजता सुटते आणि बुधवारी सकाळी ०८.४५ वाजता उधना येथे येऊन पोहोचते.

नवीन वेळापत्रकानुसार, उधना ते ब्रम्हपूर अमृत भारत एक्सप्रेस आता १९ तारखेपासून आठवड्यातून तीन दिवस रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी उधना येथून सकाळी नेहमीच्या वेळेवर ०७.१० वाजता सुटेल. ही गाडी अमळनेर स्थानकावर सकाळी ११.१२ वाजता, धरणगाव स्थानकावर ११.४५ वाजता, जळगाव स्थानकावर दुपारी १२.४७ वाजता तर भुसावळ स्थानकावर दुपारी ०१.०५ वाजता पोहोचेल. याशिवाय, परतीच्या प्रवासाला निघालेली ब्रम्हपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस आता २० तारखेपासून आठवड्यातून तीन दिवस सोमवार, गुरूवार आणि शुक्रवारी ब्रम्हपूर येथून रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०८.४५ वाजता उधना येथे पोहोचेल.
उधना ते ब्रम्हपूर दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल ११ सामान्य (अनारक्षित) श्रेणी आणि आठ स्लीपर व इतर डबे जोडले गेले आहेत. प्रत्येक डब्यात बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच आधुनिक आसने आणि झोपण्याची सोय देखील आहे.
या दोन्ही गाड्यांना खान्देशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.









