जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे शासनाकडून कापूस खरेदीला मुहूर्त मिळाला. भारतीय कपास महामंडळ (CCI) जिल्ह्यात आज १२ नोव्हेंबरपासून कापसाच्या खरेदीला सुरूवात करणार आहे. कापसाला शासनाने ८ हजार ६० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असून सीसीआयच्या केंद्रावर कापसासाठी ८ ते १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेलाच माल खरेदी करण्यात येणार आहे.

जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण १३ खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. ही सर्व केंद्रे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जातील. सर्वप्रथम जिल्ह्यात आव्हाणे येथील केंद्र सुरु होईल.याच दिवशी पाचोरा आणि बोदवड येथील खरेदी केंद्र कार्यान्वित होईल. दरम्यान, शेतकऱ्यांनी शासकीय केंद्रावर आपला माल आणण्यापूर्वी आधी कपास अॅपवर आपली नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. जर नोंदणी नसेल तर शेतकऱ्यांना आपला माल या ठिकाणी विक्री करता येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी आणि विक्रीसंबंधी अधिक माहितीसाठी संबंधित बाजार समिती किंवा शासकीय केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

इतका जाहीर झाला हमीभाव भाव?
कापसाला शासनाने ८ हजार ६० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. खासगी बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला ६७०० ते ७१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे.
दरम्यान, सीसीआयच्या केंद्रावर कापसासाठी ८ ते १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेलाच माल खरेदी करण्यात येणार आहे. १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असलेला माल या सीसीआयकडून खरेदी केला जाणार नसल्याची माहिती सीसीआय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हमीभाव
८ आर्द्रतेपर्यंत : ₹८०६०
९ आर्द्रता : ₹७९२९
१० आर्द्रता : ₹७७९८
११ आर्द्रता : ₹७६६८
१२ आर्द्रता : ₹७५३७









