जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२५ । एरंडोल तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना वरखेडी शिवारात घडली. या घटनेनंतर परिसरामध्ये शोककळा पसरली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

काय आहे घटना?
एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात अख्ख्या कुटुंबाचा शेवट झाला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण मध्य प्रदेशातील असून ते शेतात काम करण्यासाठी जात होते. वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात वन्यजीवांच्या पासून संरक्षण करण्यासाठी, शेताच्या भोवती तारेचे कुंपण घालून त्यात वीज प्रवाह सोडला होता, हा वीज प्रवाह या मजुरांच्या लक्षात न आल्याने, त्या वीज तारेच्या कुंपणाच्या धक्क्याने हे पाच जण मयत झाल्याची प्राथमिक माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

या दुर्दैवी घटनेत ४० वर्षांच्या दोन महिला, ४५ वर्षांचा एक पुरुष, सहा वर्षांची एक मुलगी आणि आठ वर्षांचा एक मुलगा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.







