जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२५ । सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने उसंती घेतली असून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या पावसाचा अंदाज नसला तरी शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

दरम्यान आज हवामान खात्याने राज्यातील आज विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आलाय. फक्त, विदर्भच नाही तर कोकणातसही अलर्ट जारी करण्यात आला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशच्या काही भागांमध्ये पाऊस हजेरी लावू शकतो. पुणे, मुंबई, सांगली, सातारा या भागातही पावसाच्या सरी कोसळू शकतात.

उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही निवडक भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाची जोरदार हजेरी सध्या कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. स्थानिक हवामानाच्या बदलामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
आज हवामान खात्याने विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.








