जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । संपूर्ण महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी आज कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. तो म्हणजे या प्रकरणात सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता कोर्टाने केली आहे. महत्त्वाचे पुरावे नाहीत आणि पंचनामा व्यवस्थित झाला नाही, यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय,यांच्यासह अनेकांवर आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

नेमकं काय झालं होतं ?
आजपासून सुमारे 17 वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासबॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे हात होता अशी माहिती समोर आली होती.
हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता. एनआयएने सात आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली होती.
अखेर आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे या खटल्याचा निकाल समोर आला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. या प्रकरणातील सातही आरोपींना कोर्टाने निर्दोष असल्याचे सांगितले.












