जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२५ । महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव राज्य सरकरने बदलले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर चं नाव आता ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली.

यापूर्वी राज्यातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) तर उस्मानाबाद (धाराशिव) आणि अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) आणि या तीन जिल्ह्यांची नावे बदलण्यात आले होते. यांनतर आता सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यात आलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी (18 जुलै) शेवटचा दिवस आहे.

या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत इस्लामपूर शहराचं नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याची मागणी 1986 पासून प्रलंबित होती. अखेर या मागणीला यश आलं आहे. राज्य सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राच्या मंजुरीनंतर इस्लामपूर शहर अधिकृतपणे ईश्वरपूर म्हणून ओळख मिळणार आहे.












