जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२५ । हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील जलसाठा वाढला आहे. यामुळे आज सकाळी हतनूर धरणाचे १० दरवाजे १ मीटरने उघडून विसर्ग करण्यात आल्यामुळे तापीनदीला पूर आला आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आठवडाभरापासून हतनूर धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले होते. दरम्यान, विदर्भात तसेच हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा जोरदार पाऊस झाला. पूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणातील जलपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुकवारी सायंकाळी ४६ पैकी १२ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. पाण्याची आवक वाढल्याने रात्री १० वाजता आणखी चार दरवाजे उघडावे लागले. मात्र, शनिवारी सकाळपर्यंत आवक थोडी कमी झाल्याने सहा दरवाजे बंद करावे लागले. शनिवारी सकाळी हतनूरचे १० दरवाजे एक मीटरने उघडे असताना, सांडव्यातून २० हजार १३० क्सूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

दरम्यान यंदा हतनूरमधून गतवर्षांच्या तुलनेत तब्बल दहा दिवस उशिराने विसर्ग होत आहे. हतनूर धरणासह शेळगाव बॅरेजमधून एकाच वेळी पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर, तापी नदी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरून वाहताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असतानाही हतनूरमध्ये सद्यःस्थितीत ६२.०६ टक्के पाणी साठा आहे.







