जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२५ । राज्यातील शिवसेना पक्षात फूट पडून आता 3 वर्षांहून अधिक काळ लोटला असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर दररोज शाब्दिक हल्ले चढवले जातात. पक्षफुटीवरुन जोरदार टीका केली जाते. मात्र शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांबद्दल एक खळबळजनक दावा केला.

शिवसेना सोडून गेलेल्यांना ते गद्दार म्हणतात, मात्र संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या वेळी संजय राऊत यांनाही सोबत गुवाहटीला यायचे होते. मात्र, सोबतच्या आमदारांनी संजय राऊतांना कडाडून विरोध केला. त्यामुळे राऊत यांना सोबत घेतलं नाही आणि हीच त्यांची मोठी पोटदुखी आहे, असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केला होता. यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक दावा केला.
शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, मात्र 35 ते 36 आमदारांनी त्यांना विरोध केला, असे शहाजी बापू पाटील यांनी म्हटले. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील शहाजी बापूंची री ओढली आहे. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. मात्र, ते त्यावेळेस थांबले, संजय राऊतच सर्वात पहिले फुटणार होते, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.









