जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२५ । सर्वाधिक उष्ण महिना समजल्या जाणाऱ्या मे महिन्यात वातावरणात मोठा बदल झाला आहे. मागच्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत असून अद्यापही राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. हवामान खात्याने आज १५ मे रोजी राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व भागांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष आज जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

या २८ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट?
हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
बुधवारी जळगावचे कमाल तापमान ३६.७ अंश इतके होते. दरम्यान आज १५ मे रोजी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस तर कमाल ३७ अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून यादरम्यान अंशतः ढगाळ वातावरणासोबत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.