जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात उष्णतेने कहर केला असून एप्रिल महिन्यात पारा ४१ ते ४३ अंशांदरम्यानच राहिल्याने उष्णतेने जळगावकर होरपळून निघत आहे. दरम्यान आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच जळगावकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. कारण हवामान खात्याने आगामी तीन दिवस जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून त्याच पार्श्वभूमीवर आज ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे.

जळगावात बुधवारी पारा ४३.५ अंशावर होता. एप्रिल महिन्यात यंदा सरासरी पारा ४२ ते ४३ अंश इतका राहिला आहे, तर मे महिन्यात सरासरी तापमानात वाढ होण्याचाही अंदाज आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात ४१ अंश सरासरी तापमान राहिले होते, यंदा मात्र १ अंशांची वाढ झालेली आहे. १ ते ३ मेदरम्यान पारा ४३ ते ४४ अंशावर राहू शकतो. जिल्ह्यात आयएमडीकडे अधिकृत नोंद झालेल्या तापमानानुसार ४३.८ अंश तापमान यंदाचे सर्वाधिक आहे.
आगामी पाच दिवसांचा अंदाज
दिनांक… दिवसाचा पारा… वातावरणाची स्थिती
१ मे – ४३ अंश… उष्ण व आर्द्रतायुक्त
२ मे – ४३ अंश… निरभ्र व कोरडे
३ मे – ४४ अंश… निरभ्र व कोरडे
४ मे – ४२ अंश… सकाळी कोरडे, दुपारनंतर पाऊस
५ मे – ४१ अंश… दुपारनंतर गडगडाटासह पाऊस