दहिवद येथे चोरट्यांचा हैदोस; भरदिवसा ५ घरांचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लांबविला

नोव्हेंबर 28, 2024 2:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून आले. यातच अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे भरदिवसा ५ घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ७ लाख १९ हजार २०० रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बनले असून याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Project 10

केतन ताथु माळी हे २६ रोजी सकाळी ८ वाजता शेतात कामाला निघून गेले होते. त्यांनी घराची किल्ली बाहेर सरईवर ठेवली होती. सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यावर त्यांना घर उघडे दिसले. घरातील कोठीत ठेवलेले पैसे आणि सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. त्याचप्रमाणे गावातील आणखी चार घरे उघडून चोरट्यानी चोऱ्या केल्याचे समजले. केतन माळी यांच्या घरातून ३ लाख २५ हजार रुपये रोख , २२ हजार ५०० रुपयांचे ७ ग्राम सोन्याचे झुबे , २१ हजार रुपयांचे ७ ग्राम झुबे , ९ हजार रुपयांचे ३ ग्राम सोन्याचे दागिने , ६ हजार रुपयांचे २ ग्राम सोने , ४ हजार ४०० रुपयांचे ११ तोळे चांदी , ४ हजार रुपयांचे १० तोळे चांदी , २ हजार रुपयांचे ५ तोळे चांदीचे वाळे ,१२०० रुपयांचे ३ तोळे चांदीचे कडे असा एकूण ३ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

हरीलाल तापीराम माळी यांच्या घरातून ५० हजार रुपये रोख , ३६ हजार रुपयांचे १२ ग्राम सोन्याचे झुबे, ३० हजार रुपयांचे १० ग्राम सोन्याच्या अंगठ्या , १८ हजार रुपयांच्या ६ ग्राम वजनाच्या २ अंगठ्या ,१६०० रुपयांची चांदी , २ हजार रुपयांच्या चांदीचे वाळे असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज, राजेंद्र शंकर पाटील यांच्या घरातून ९० हजार रुपयांची ३० ग्राम सोन्याची माळ , ५१ हजार रुपये किमतीची १७ ग्राम सोन्याची मिनीमाळ ,१८ हजार रुपये किमतीचे ६ ग्राम सोन्याचे झुबे, १२ हजार रुपये किमतीचे ४ ग्राम सोन्याच्या अंगठ्या १५०० सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.

अविनाश सैतान माळी यांच्या घरातून सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने , राजेंद्र रुपचंद पाटील यांच्या घरातून ८ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाख८३ हजार रूपये रोख , ३ लाख २१ हजार रुपयांचे १०९ ग्राम सोन्याचे दागिने व १५ हजार २०० रुपये किमतीचे ३४ तोळे चांदी असा एकूण ७ लाख १९ हजार २०० रुपयांचा माल चोरीस गेला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील, उज्वल म्हस्के , प्रशांत पाटील, एलसीबीचे संदीप पाटील, राहुल कोळी तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेटी देऊन पंचनामे केले.

पाचही घर मालकांनी आपल्याघराच्या किल्ल्या घरच्या बाहेर टांगलेल्या किंवा घराबाहेरच कोठेतरी ठेवलेल्या होत्या. चोरट्यांना ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास असल्याने त्यांनी ही संधी साधली असावी. अमळनेर पोलीस स्टेशनला केतन माळी याच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३) व कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी घराच्या किल्ल्या बाहेरच कोठेतरी ठेवून जातात. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यानी घरे न फोडता उघडून चोऱ्या केल्या आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now