जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२४ । राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मदतीची अपेक्षा करीत आहे. यातच मुक्ताईनगरातील महायुती मेळाव्यातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे आश्वासन दिल. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. गेल्या दोन वर्षांत मुक्ताईनगर मतदारसंघाला पाच हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याचे ते म्हणाले.
मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमचे सरकार कोणाच्या विरोधात नाही. आमचे सरकार हे देना बैंक असून, लेना बैंक नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना मारला. मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षण देणारे आपले सरकार देशात पहिले असल्याचे ते म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केल्यानंतर मुक्ताईनगरसाठी भरघोस निधी दिल्याचे ते म्हणाले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी मनोगतात जिल्ह्यात कापूस आणि विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली.
याप्रसंगी मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील उद्धव सेना व राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या विरोधकांना १५०० रुपयांचे महत्त्व काय कळणार, असा टोला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फड़के यांनीही मनोगत व्यक्त केले.