⁠ 
शनिवार, मे 4, 2024

केळी महामंडळासाठी 50 कोटीची तरतूद : सभागृहात मुख्यमंत्र्याची माहिती..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२३ । मागील काही कालावधीत केळी पिकांवर अनेक संकट आली आल्याने केळीची पीकं आणि शेतकरीही धोक्यात आले आहेत. त्यामुळे केळी महामंडळाच्या औचित्याचा मुद्दा भाजप आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत उपस्थित केला. सावकारे यांच्या या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवेदन देत केळी महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आज विधानसभेत दिली.

दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावात आले असता यावेळी त्यांनी केळी महामंडळासाठी 100 कोटीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही केळी महामंडळाची स्थापनाच झालेली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही. त्यामुळे केळी महामंडळाची स्थापना तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार संजय सावकारे यांनी विधानसभेत केली.

आमदार संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवेदन दिले. राज्यात केळी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य शासनाने घेतला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून केळी पिकाबाबत संशोधन करण्यात येणार असून या महामंडळासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी आज दिली